रामगोपाल मावस्कर यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर
1 जुलै रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान; टिटाम्बा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
युवा मेलघाट न्यूज़ प्रतिनिधि
धारणी, 27 जून: धारणी तालुक्यातील टिटाम्बां येथील प्रगतिशील शेतकरी रामगोपाल सुखराम मावस्कर यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 23 जून 2026 रोजी पत्र काढून याबाबत कळविले आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन 2024 चा हा पुरस्कार रामगोपाल मावस्कर यांना जाहीर झाला आहे.
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी डॉम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-18 येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मावस्कर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व दोन नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यांचा प्रवास, उपस्थिती व इतर आवश्यक खर्च कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रामगोपाल मावस्कर यांनी टिटाम्बां परिसरात नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल धारणी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









