7 दिवस, सलग छापे, सील कारवाई; नागरिक विचारतायत – ‘आतापर्यंत कुठे होता FDA?‘ आदिवासी बहूल मेळघाटात कारवाई कधी ?
युवा मेलघाट / न्युज नेटवर्क
मुंबई/अमरावती: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या ‘मुंडे इफेक्ट’ दिसतोय। आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच भेसळखोर आणि काळाबाजार करणाऱ्यांची झोप उडाली आहे।
गेल्या आठवड्याभरात राज्यभरात धडाधड छापेमारी सुरू आहे। संशयित अन्नसाठे जप्त, नियम मोडणाऱ्या कंपन्या सील, बेकायदा गोदामांवर कारवाई – असा सपाटा लावल्याने वर्षानुवर्षे मोकाट सुटलेल्या भेसळ माफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे।
‘सिस्टम अचानक जागा कसा झाला?’
प्रशासनिक वर्तुळात चर्चा आहे की मुंडेंच्या येण्याने विभागाच्या कामाला गती आणि धार आली आहे। ज्या गोष्टी वर्षानुवर्षे ‘चालू द्या’ म्हणून दुर्लक्षित होत्या, त्या आता रडारवर आल्या आहेत।
पण मेलघाटचं काय?
राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना आदिवासी बहुल मेलघाटातील नागरिकांचा सवाल आहे – ‘इथे कधी येणार FDA?’ मेलघाटसारख्या दुर्गम भागात आजही निकृष्ट दर्जाचा किराणा, भेसळयुक्त तेल, बनावट औषधे, भेसळयुक्त दूध, मिष्ठान्न सर्रास विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत। आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या या भागात भेसळीचा थेट परिणाम आदिवासींच्या जीवावर होतो। त्यामुळे मुंडेंची धडक मोहीम मेलघाटात पोहोचणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिकांनी मागणी केली आहे की शहरांप्रमाणेच आदिवासी भागातही तातडीने छापे टाकून कारवाई करावी।
पण याच वेळी सामान्य माणसाचा सवाल आहे – ‘आठवड्याभरात इतका माल सापडतोय, मग इतकी वर्षे हा भेसळीचा बाजार चालूच कसा होता?’ निकृष्ट अन्नामुळे थेट लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता, मग कारवाईला मुहूर्त कशाला लागला? नागरिक या कारवाईचे स्वागत करत आहेत, पण ‘उशीर का झाला’ हा प्रश्नही विचारत आहेत।
इच्छाशक्तीचा दाखला, पण पुढे काय?
एक अधिकारी ठरवून कामाला लागला तर बदल घडतो, हे मुंडेंनी दाखवून दिलं। पारदर्शकता आणि जबाबदारीने काम केलं तर ‘काही होत नाही’ ही मानसिकता बदलते, याचं हे उदाहरण।
मात्र खरी कसोटी पुढे आहे। ही मोहीम फक्त ‘सुरुवातीचा धडाका’ ठरेल की सातत्याने चालेल? राज्यात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि राजकारण हे समीकरण नवीन नाही। त्यामुळे भेसळीविरुद्धचं हे युद्ध किती दिवस चालतं आणि त्याचा कायमचा इम्पॅक्ट पडतो का, याकडे महाराष्ट्रा सोबत मेळघाट चा लक्ष लागलंय।
युवा मेलघाट निर्भीड वार्तापत्र
जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांवर बेधडक











