अमरावती जि.प. शिक्षक पदोन्नती वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. TET अभावी शिक्षक कोर्टात. मुख्याध्यापकांची कंत्राटी भरतीची मागणी. कोर्टाच्या स्थगितीमुळे शिक्षण वेठीस
युवा मेलघाट न्यूज | अमरावती, 15 जून 2026
अमरावती: पदोन्नतीतून यांना वगळले, त्यांना घेतले.. मग चला कोर्टात! हे चित्र आता नित्याचेच झाले आहे. शासनालाही कदाचित तेच अपेक्षित असावे. पण या साऱ्या भानगडीत त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा काय दोष? दरवर्षी शिक्षक भरती अभावी, पदोन्नतीच्या वादांमुळे प्रशासन चिमुकल्यांच्या जीवावर का उठते? त्यांना दर्जेदार शिक्षणापासून का रोखले जाते? वर्गात शिक्षकच नसेल तर तोडके-मोडके शिक्षक गुणवत्ता काय देणार? अशा सवाल उपस्थित झाला आहे .
TET-CTET च्या वादाने शिक्षण वेठीस
वृत्तसंस्थाच्या बातमीनुसार, TET/CTET पात्रता नसल्याच्या कारणावरून अमरावती जि.प.च्या शिक्षकांना पदोन्नतीच्या ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आले. त्याविरोधात 28 शिक्षक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले. न्यायालयाने पदोन्नती प्रक्रिया सुरू ठेवण्याची मुभा दिली असली तरी अंतिम निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे.
2009 मध्ये RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या या शिक्षकांना 2013 च्या शासन निर्णयाने TET अनिवार्य केले. नंतरच्या दुरुस्तीने जुन्या शिक्षकांना सूट दिली होती. मात्र शिक्षण संचालकांच्या 14 मे 2026 च्या पत्राने 1 सप्टेंबर 2025 पर्यंत TET/CTET उत्तीर्ण असणाऱ्यांनाच पात्र ठरवले. यामुळे वाद निर्माण झाला.
न्यायालयीन स्थिती: न्यायालयाने राज्य शासनाला 18 जूनपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे.
कागदावरची गुणवत्ता, वर्गात रिकामे: वस्तुस्थिती अशी आहे की वर्गापासून वरपर्यंत फक्त कागदावरच गुणवत्ता आहे. कुणालाही कशाचेही देणे-घेणे नाही. फक्त अहवाल बरोबर गेला पाहिजे यातच सर्वजण गुंतले आहेत. मागच्या वर्षीचे ‘प्रगत’ विद्यार्थी यावर्षी पुन्हा ‘अप्रगत’ होतात. खरंतर ते तेव्हाही प्रगत नव्हतेच.

श्री रविंद्र दिनकरराव घवळे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, अमरावती जिल्हा परिषद यांची शासनाला कळकळीची विनंती: पदोन्नतीचा, शिक्षक भरतीचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण आज विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक उपलब्ध होईल अशी तडकाफडकी कंत्राटी शिक्षक भरती करावी. प्रभारी केंद्रप्रमुखांच्या जागी आणि सर्व रिक्त जागी शेवटची जागा भरेपर्यंत शिक्षक द्यावेत. किमान यावर्षी तरी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, हीच मनापासून अपेक्षा. अशी आर्त हांक रविंद्र दिनकरराव घवळे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अमरावती जिल्हा परिषद यांनी शासनाला
केली आहे .










