खासदार बळवंत वानखडेंचा धारणी रुग्णालय आणि टिटंबा आश्रमशाळेला दौरा, अधीक्षक-मुख्याध्यापकांच्या निलंबनाचे आदेश
युवा मेलघाट न्यूज
धारणी, २७ जुलै २०२६
धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विषबाधा झाल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट टिटंबा आश्रमशाळेला जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 50 ते 60 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची खासदार वानखडे यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले. प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयातील व्यवस्थेतील काही त्रुटी निदर्शनास येताच त्यांनी अधीक्षकांची कानउघाडणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबत कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.




रुग्णालयातील पाहणीनंतर खासदार वानखडे यांनी टिटंबा आश्रमशाळेला भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि गंभीर लापरवाही दाखवणाऱ्या प्रकरणावर त्यांनी कठोर भूमिका घेतली. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या आश्रमशाळेच्या अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवर तात्काळ सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांना दिले.




विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि गैरव्यवस्थापनाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
या दौऱ्यात माजी आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, ठाणेदार चव्हाण, सभापती रोहित पटेल, नगरसेवक पंकज मोरे, राजाखान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कालूभाई मालवीय, तालुका अध्यक्ष सहदेव बेलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. खासदारांच्या या भेटीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्य विभागाचे पथक रुग्णालयात तैनात करण्यात आले असून बाधित विद्यार्थ्यांच्या उपचारावर विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान टिटंबा घटनेमुळे मेळघाटातील आश्रमशाळांमधील सेंट्रल किचनच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर आणि तातडीचे पाऊल उचलले जाईल असे आश्वासन खासदार वानखडे यांनी पालकांना दिले आहे.








