टिटंबा विषबाधा प्रकरण: पुरवठादारावर गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलनाचा इशारा, शिवसेनेची आक्रमक भूमिका
युवा मेलघाट न्यूज
धारणी, २६ जुलै २०२६ : धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेत आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र या हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा संघटक मन्ना दारसिंबे आणि धारणी तालुका प्रमुख शैलेश मालवीय यांच्या नेतृत्वाखाली पालकांसह आश्रमशाळा परिसरात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अन्न पुरवठादार, मुख्याध्यापक, वॉर्डन आणि स्वयंपाकी यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



मन्ना दारसिंबे यांनी सांगितले की लहान मुलांच्या जेवणातून विषबाधा होणे आणि त्यामुळे मुले रुग्णालयात दाखल होणे हा अतिशय गंभीर आणि वेदनादायी प्रकार आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून टेंभू येथील सेंट्रल किचनमधील गैरव्यवहार उघड करावा. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी त्यांनी केली.
पालक वर्गासोबत झालेल्या चर्चेनंतर जर प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही तर पायी धारणी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात रमेश तोटे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक सहभागी होणार आहेत. टिटंबा येथील या घटनेमुळे मेळघाटातील आश्रमशाळांमधील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी भूमिका शिवसेने घेतली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.








