वलगावात स्मृती सेवाश्रम व सिकची ट्रस्टतर्फे दिव्यांगांना झेरॉक्स, गिरणी मशीन वाटप. आमदार रवी राणा, प्रकाश साबळे उपस्थित. ‘भिऊ नकोस’ चा संदेश.
युवा मेलघाट | प्रतिनिधि अमरावती
वलगाव, अमरावती, 11 जून 2026: समाजातील दुर्लक्षित दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी वलगाव येथे ‘मदतीचा हात’ हा भव्य उपक्रम राबवण्यात आला. स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिकची रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमात गरजू दिव्यांगांना झेरॉक्स मशीन, पीठ गिरणी व मिरची कांडप केंद्र यांसारखे रोजगाराभिमुख साहित्य वितरित करण्यात आले.

“दिव्यांगांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर” – आमदार रवी राणा
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आमदार श्री. रवी राणा यांनी दिव्यांग बांधवांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “समाजातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर आहे.”
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे समाजाचे ब्रीद असावे – प्रकाश साबळे
माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश साबळे यांनी दिव्यांग, पीडित, शोषित व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी समाजाने संवेदनशीलता दाखवण्याची गरज व्यक्त केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री. हेमंत काळमेघ यांनी प्रकाश साबळे यांच्या समाजपयोगी उपक्रमाचे अभिनंदन केले.

7 वर्षांपासून अविरत सेवा
प्रस्तावनेत डॉ. दिलीप काळे यांनी सांगितले की, स्मृती सेवाश्रम व सिकची ट्रस्ट गेल्या सात वर्षांपासून संयुक्तपणे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रकार श्री. विजयराव राऊत, जिजाऊ बँकेचे माजी अध्यक्ष श्री. अविनाशजी कोठाळे, संत अच्युत महाराज रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, डॉ. दिलीप काळे, गजानन रडके, डॉ. गुणवंत डहाणे, युवा उद्योजक नितीन भटकर, गौरव इंगळे, सचिन मालकर यांच्यासह अनेक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
डॉ. अनिल सावरकर यांनी “सेवा परमो धर्म” या उक्तीनुसार गरजू रुग्णांना संत अच्युत महाराज हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार
यावेळी 100% दृष्टिहीन प्रा. संजय काळे, अपंग संघटनेचे अध्यक्ष मयूर मेश्राम आणि उद्योजक श्री. अशोकराव गावंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल तायडे, विनोद जायलवाल, निलेश उभाड, प्रा. सुनील सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.













