मेळघाटाचा आढावा: आकडे सुधारले, पण पोटापर्यंत अन्न पोहोचले पाहिजे
रिक्त पदे भरा, नॉर्मल डिलिव्हरी वाढवा आणि पोषण आहारात तडजोड नको
युवा मेलघाट न्यूज – संपादकीय
धारणी | रविवार, २६ जुलै २०२६ महिला व बालविकास मंत्री मा. अदिती तटकरे यांच्या धारणी येथील आढाव्यातून मेळघाटाच्या प्रगतीसोबतच काही मूलभूत त्रुटीही समोर आल्या आहेत. IMR 41 वरून 14.3 आणि संस्थात्मक प्रसूती 96.75 टक्के ही प्रगती समाधानकारक आहे. गंभीर कुपोषित मुले 383 वरून 146 वर आली आहेत. मात्र 3,273 मुले आजही कुपोषित आहेत आणि त्यातील 68 टक्के मुले धारणी-चिखलदरा या दोन तालुक्यात आहेत. म्हणजे प्रगती झाली आहे, पण शेवटच्या टोकापर्यंत ती पोहोचलेली नाही.
प्रशासनासमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे मनुष्यबळाचा अभाव. महिला बालविकास विभागातील 130 पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात CHO ची 35 पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षिकाच नसल्याने 2592 अंगणवाड्यांवर नियंत्रण कोण ठेवणार? यामुळे PMMVY आणि लेक लाडकी सारख्या योजनांची अंमलबजावणी रखडली आहे. कुपोषण दूर करण्याच्या लढाईत पुरवठादार आणि पोषण आहाराची गुणवत्ता हा सर्वात संवेदनशील मुद्दा: गरोदर माता आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार हा त्यांच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्याचा पाया आहे. बैठकीत मंत्रींनी याबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पुरवठादाराने दिला जाणारा पोषण आहार उत्कृष्ट आणि दर्जेदार असावा. यादीत दाखविला जाणारा आहार आणि प्रत्यक्षात मातांना दिला जाणारा आहार यात तफावत असता कामा नये.
मात्र केवळ दर्जेदार आहार पुरवून भागणार नाही. तो आहार गरोदर मातेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिनेच तो खाल्ला पाहिजे. अंगणवाडी स्तरावर मातांना समजावून सांगणे आवश्यक आहे की हा आहार त्यांनी घरी नेऊन कुटुंबातील इतर सदस्यांसोबत वाटून घेऊ नये. हा आहार केवळ तिच्यासाठी आणि तिच्या पोटातील बाळासाठी आहे. जर मातेने स्वतः तो घेतला नाही तर योजनेचा उद्देश साध्य होणार नाही आणि कुपोषण कमी होणार नाही. यासाठी अंगणवाडी सेविका आणि ASHA यांनी दररोज मातांच्या घरी जाऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मातांचा आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास. अनेक कुटुंबे अजूनही घरातच नॉर्मल डिलिव्हरी होईल या भावनेतून आणि सरकारी दवाखान्यात सिजर करतात या भीतीने दवाखान्यात जाणे टाळतात. यामुळे वेळेवर तपासणी होत नाही. आरोग्य विभागाने नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण वाढविले पाहिजे. PHC मध्ये 24×7 सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मातांशी सौजन्याने वागणूक दिली तरच मातांचा विश्वास बसेल आणि त्या वेळेवर दाखल होतील. तेव्हाच माता मृत्यू आणि बाल मृत्यूचे प्रमाण खरोखर कमी होईल.
बालविवाहाचा प्रश्न देखील गंभीर आहे. काही भागात बालविवाह प्रथा आहे तर पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाणही आहे. यामुळे अल्पवयीन मातांचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी गावपातळीवरील आदिशक्ती समित्या सक्रिय करून 90 टक्के महिला आणि मान्यवरांच्या सहभागातून जनजागृती करावी लागेल. One Stop Centre मधील 4 रिक्त पदे त्वरित भरावीत.
663 अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये आहेत ही वस्तुस्थिती देखील बदलली पाहिजे. जोपर्यंत मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळत नाही तोपर्यंत पोषण आणि शिक्षण दोन्ही अपुरे राहील.
मंत्रींनी दिलेले 2026-27 पर्यंत कुपोषणमुक्त मेळघाट चे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत. पहिली – रिक्त पदांची त्वरित भरती. दुसरी – गरोदर मातेपर्यंत दर्जेदार पोषण आहार पोहोचवून त्याची काटेकोर तपासणी. तिसरी – मातांचा आरोग्य यंत्रणेवर विश्वास निर्माण करून नॉर्मल डिलिव्हरीला प्रोत्साहन.
योजना आहेत, निधी आहे. आता गरज आहे ती प्रामाणिक अंमलबजावणी आणि गावागावात पोहोचण्याची. जर पुरवठादाराने तडजोड केली नाही, मातेने आहार वाटून खाल्ला नाही आणि डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य दिले, तरच मेळघाट खऱ्या अर्थाने निरोगी होईल.
_संपादक,
युवा मेलघाट न्यूज ब्युरो टिम








