NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया: “युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही, दोषींना कठोर शिक्षा”
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: NEET पेपर लीक प्रकरणानंतर विरोधकांच्या आंदोलनामुळे देशभरात गदारोळ माजला होता. अखेर कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिल्यांदा मौन सोडले. मंगळवारी झालेल्या NDA संसदीय पक्षाच्या “मंगल मिलन” बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “युवकांच्या भविष्याशी कोणीही खेळ करू देणार नाही. पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेपर लीक हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही. हा देशाच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. बातमी समोर येताच सरकारने तातडीने कारवाई करत 13 आरोपींना अटक केली आणि त्यांना तुरुंगात पाठवले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुनर्परीक्षेला प्राधान्य दिले आणि ती यशस्वीरित्या पार पाडून निकालही वेळेत जाहीर केला. “पुढे असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला एक दोषरहित आणि Foolproof परीक्षा यंत्रणा तयार करावी लागेल,” असे मोदींनी सांगितले. यासाठी देशातील सर्व राज्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पेपर लीकमध्ये सहभागी असलेल्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वोच्च दर्जाच्या वकिलांची मदत घेणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, CJP च्या संसद मोर्चादरम्यान मोठा गोंधळ झाला. आंदोलक संसदेजवळ पोहोचताच दिल्ली पोलीस आणि RAF कडून लाठीचार्ज करण्यात आला. अश्रुधुराचे नळकांडेही फोडण्यात आले. मोर्चानंतर CJP चे सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. जवळपास दोन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास सांगितल्या. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता CJP ने आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सुपूर्द केले. मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार विद्यार्थ्यांबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे आणि भविष्यात पेपर लीक रोखण्यासाठी कडक कायदे आणि यंत्रणा उभारली जाणार आहे.








