मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सिपना वन्यजीव विभागाच्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात 4 रानगवे आणि एका भेडकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वन्यजीव वर्तुळात खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या गस्ती पथकाला जंगलात फिरत असताना हे पाचही प्राणी मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र विषबाधा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी प्राणी मृत असण्याची शक्यता
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जंगल परिसरात आणखी काही वन्यजीव मृतावस्थेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. या प्रकरणाबत संबंधित वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
मेळघाटसाठी धोक्याची घंटा
मेळघाट व्याघ्र प्रकल्प जैविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे एकाच वेळी 5 मोठ्या प्राण्यांचा मृत्यू होणे ही बाब चिंताजनक आहे. जर विषबाधा सिद्ध झाली, तर शिकार किंवा जंगलातील बेकायदेशीर कारवायांचा संशय बळावणार आहे. स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चौराकुंड हा परिसर जंगलाचा संवेदनशील भाग मानला जातो. मागील काही वर्षांतही येथे वन्यजीव मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. वन विभागाने गस्त वाढवून अशा घटना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.










