मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; 250 महिला शेतकऱ्यांना विविध बियाण्यांची मदत: “हा वाटप नव्हे, तर बीज साखळी कार्यक्रम” सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन: “कुपोषणमुक्त मेळघाट घडवूया”
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
धारणी, दि.16 जून 2026: समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सिद्धार्थ शुक्ला (IAS), सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून सुमित कुमार (IFS), सहाय्यक वनसंरक्षक, अकोट आणि उमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी, धारणी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. लांडे, डॉ. सचिन शिंदे, श्री माने आणि डॉ. मते यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रगती सहयोगचे श्री स्वामी डूरके यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी समाज प्रगती सहयोग आणि कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या संयुक्त उपक्रमांचा आढावा घेतला. मागील रब्बी हंगामात 200 शेतकऱ्यांना प्रत्येकी 30 किलो हरभरा बियाणे मदत तसेच 30 कृषी पंपांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “हा केवळ बीज वाटप कार्यक्रम नसून बीज मदत कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकरी भगिनींनी पुढील वर्षी स्वतःच्या उत्पादनातून प्राप्त बीजाचा हिस्सा इतर गरजू शेतकरी महिलांना देऊन या उपक्रमात योगदान द्यावे. तसेच बियाण्यांचे संगोपन करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले. बीज मदतीचा तपशील:185 शेतकऱ्यांना लाल तूर बियाणे, 50 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, इतर बियाणे राळा, कुटकी आणि नाचणी बियाण्याचे मदत करण्यात आले. धारणी तालुक्यातील सुमारे 45 गावांमधील 150 महिला आणि 50 पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन: कार्यक्रमादरम्यान कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी बियाण्यांची प्रक्रिया, उगवणक्षमता (Germination) आणि खरीप हंगामात शेती करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी सध्याच्या कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, योग्य पावसाची प्रतीक्षा करूनच शेतीची कामे सुरू करावीत. तसेच धारणी येथे लवकरच एपीएमसी बाजार समिती (मंडी) सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहिती देत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे संबोधन: प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. शुक्ला यांनी शेतीबरोबरच मेळघाटातील कुपोषण, बालविवाह, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. “कोरकू आदिवासी समाजाची पारंपरिक शेतीपद्धती जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले. शासनाकडून शिक्षण, उपजीविका आणि विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. पारंपरिक पोषक पिकांची लागवड वाढवून पोषण सुरक्षा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांनी व्यवस्थापन आराखडे तयार करून जंगलातील जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
सहाय्यक वनसंरक्षक सुमित कुमार (IFS) म्हणाले: “जंगल हे आदिवासी समाजाचे पारंपरिक संसाधन असून त्याचा शाश्वत वापर आणि संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलातील उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करताना त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामसभांनी पुढाकार घ्यावा.”
कुपोषणमुक्त मेळघाटची शपथ
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांनी कुपोषणमुक्त मेळघाट घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांनी एकत्रितपणे “हमारा स्वास्थ्य हमारी जिम्मेदारी, कुपोषण मुक्त मेळघाट हमारी भागीदारी”अशी घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास समाज प्रगती सहयोगचे कमलजी, सूरज, देवेंद्र, साक्षी आणि रामदास यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती











