पद्मश्री जनार्दन पंत बोथे गुरुजींचा सेवक सुभाष येनोरकर यांच्याकडून गुरुकुंज आश्रमात सत्कार. “गुरु के पैर मत छूओ, उनके बानी पर अमल करो” या तुकडोजी महाराजांच्या शिकवणीचा जागर. 1972 पासूनचे गुरु-शिष्य नाते.
युवा मेलघाट| धारणी प्रतिनिधी
गुरुकुंज मोझरी, 16 जून 2026 | भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले थोर शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक जनार्दन पंत बोथे गुरुजी यांचा धारणी येथील सेवक सुभाष येनोरकर यांनी कुटुंबियांसह गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे जाऊन भावपूर्ण सत्कार केला. “माझ्या आदर्श जीवनाचे शिल्पकार” : सुभाष येनोरकर म्हणाले, “1972 साली वयाच्या 9 व्या वर्षी, इयत्ता 5 वी पासून बी.ए. पर्यंत श्री गुरुदेव मानव सेवा छात्रालय, गुरुकुंज व श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे मी शिक्षण घेतले. त्यावेळी गुरुजींचे जीवन वैराग्य, त्यागी व तपस्वी असे होते. त्यांचे जीवन मी जवळून अनुभवले व त्याप्रमाणे आचरणाचा जीवनात प्रयत्न केला.”गुरुकुंजातील संस्कारांची शिदोरी : येनोरकर यांनी सांगितले की, सामुदायिक ध्यान-प्रार्थना, श्रमदान, बौद्धिक सत्र, योगासने, प्राणायाम, निद्रा पूर्व प्रार्थना, प्रातःस्मरण, रामधून इत्यादी गोष्टींमुळे जीवनाला सुसंस्काराचा अलंकार गुरुजींनी दिला. “जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुरूंच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात – ‘गुरु के पैर मत छूओ, उनके बानी पर अमल करो’ हीच जीवनामध्ये मिळालेली संस्काराची शिदोरी आहे.” गुरुजींची शिकवण: “ग्रामगीता ग्रंथाचे अनुकरणप्रिय जीवन जगावे व समाजसेवा आपल्या हातून घडावी” हेच गुरुजींनी शिकवले. राष्ट्रसंतांच्या वाङ्मयावर श्रद्धा ठेवून 1988 पासून भोकरबर्डी येथे गुरुजींनी स्थापन केलेली प्राथमिक शाळा ‘लवकिका’ पर्यंत पोचविली.
सहपत्नीक सत्कार : याप्रसंगी सुभाष येनोरकर, वंदना येनोरकर, मयूर येनोरकर व डॉक्टर प्रमोद बैस (नागपूर आकाशवाणी कलावंत) यांनी गुरुजींचे पूजन व शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मातोश्री प्रमिला ताई बोथे यांचाही सहपत्नीक सत्कार करण्यात आला. “लाखो गुरु हे जगत मे…” सत्कारानंतर येनोरकर भावूक होऊन म्हणाले, “लाखो गुरु हे जगत मे पर एक भी नही काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक है बाकी नही कुछ ध्यान दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरुपर जान दे.” पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे मेलघाटमधील मित्रमंडळींसोबत घेऊन गुरुकुंज आश्रमाला पोहोचलो, असे ते म्हणाले. पद्मश्री जनार्दन पंत बोथे गुरुजी हे आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी जीवन वाहून घेतलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.









