युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
धारणी दि. 22 मई | मेळघाटातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांच्या निराकरणासाठी मा. आमदार केवलरामजी काळे साहेब यांच्या वतीने धारणी येथे भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात तालुक्यातील शेकडो नागरिक, शेतकरी, महिला आणि तरुणांनी सहभाग नोंदवत आपल्या अडीअडचणी मांडल्या. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शेती आणि रोजगाराशी संबंधित समस्या लोकांनी थेट केवलराम काळे यांचा समोर मांडल्या.
“जनतेचा आवाज बनणे हेच आमचे कर्तव्य”
मा. आमदार केवलरामजी काळे साहेबांनी “मेळघाटातील जनतेचा आवाज बनून स्थानिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या निराकरणासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे हेच आमचे कर्तव्य आणि ध्येय आहे.” असे सांगितले.
जनता दरबारात आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद करून संबंधित विभागाकडे तातडीने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. काही समस्यांवर जागेवरच प्रशासकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्ग काढण्यात आला.
जनसेवेसाठी तत्परतेचा संदेश
जनता दरबारात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले की, अशा प्रकारे थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचता येणे हा मोठा दिलासा आहे. “गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागतील अशी आशा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदारांचे स्वियसहाय्यक, आयोजकांनी स्पष्ट केले की, “जनसेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. मेळघाटातील प्रत्येक गावातील समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा, आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यासाठी लढू.”
जनता दरबारात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.










